शेतकऱ्यांचे प्रश्नच अधिवेशनाचा केंद्रबिंदू : मुख्यमंत्री फडणवीस




नागपूर : पावसाळी अधिवेशन असल्याने त्याचा केंद्रबिंदू अर्थातच खरीप हंगाम आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हेच असेल. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी या अधिवेशनात निर्णय घेतले जातील. तसेच या अधिवेशनात 27 विधेयकांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.३) दिली. 

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येथील रामगिरी निवासस्थानी आयोजित चहापान कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेस मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, अनेक दशकानंतर जुलैमध्ये नागपूर येथे अधिवेशन होत आहे. सध्या खरीप हंगाम सुरू आहे. राज्यात 2 जुलैपर्यंत सरासरी 96 टक्के इतका पाऊस झाला आहे. 157 तालुक्यात 100 टक्के पाऊस झाला आहे, तर 2 तालुक्यात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 28 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. मागील खरीप हंगामात कापसावर बोंडअळीचा प्रश्न निर्माण झाला होता. या बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना विम्याच्या भरपाई पोटी 2 हजार 337 कोटी रुपये द्यावयाचे होते. त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 100 कोटी रुपये देण्यात आले आहेत. उर्वरीत रक्कम देण्याची कार्यवाही सुरु आहे. बोंडअळी नुकसानीची 18 लाख 16 हजार 557 शेतकऱ्यांना थेट मदत देण्यात आली आहे. याशिवाय नुकतीच 300 कोटी रुपयांची मागणी आली आहे. तीही देण्यात येईल.
पीक कर्जाकडे राज्य शासन गांभीर्याने पाहत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत 25 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले आहे. पुढील महिन्यांपर्यंत पीक कर्ज वाटप सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. मागील शासनाच्या काळात दरवर्षी सरासरी 17 ते 18 हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप होत होते. आमच्या काळात पीक कर्ज वाटप वाढले आहे. पहिल्या वर्षी 40 हजार कोटी, दुसऱ्या वर्षी 46 हजार कोटी तर तिसऱ्या वर्षी 25 हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांकडून तूर डाळ व चना डाळीची विक्रमी खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 2017-18 मध्ये 2 लाख 65 हजार 854 शेतकऱ्यांकडून 1835 कोटी रुपये किंमतीची 3 लाख 36 हजार 718 टन एवढी तूर खरेदी करण्यात आली आहे. यासाठी 5 हजार 450 रुपये एवढी आधारभूत किंमत देण्यात आली. तसेच 1 लाख 40 हजार शेतकऱ्यांकडून 1 लाख 94 हजार 626 टन हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. मागील शासनाच्या काळात 2001 ते 2014 या कालावधीत 426 कोटी रुपयांची धान्य खरेदी झाली होती. गेल्या 3 वर्षात 8 हजार कोटी रुपयांच्या धान्याची खरेदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने यंदाच्या अधिवेशनात दुधाच्या संदर्भातील समग्र धोरण जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शेतकरी कर्जमाफी संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आतापर्यंत 46 लाख खाती पूर्ण झाली असून 38 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीचे पैसै जमा झाले आहेत. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला कर्जमाफी मिळेपर्यंत ही योजना सुरु राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ड्रीम नेशन इंडिया आधुनिक शेतीविषयक  मासिक फक्त १२०० रुपये मध्ये आपणास ३ वर्षे म्हणजे ३६ मासिक प्रती मिळतील तसेच त्यावर प्रकाशन प्रथम वर्ष ऑफर म्हणून आमची #Dreams_Krushi_Samrat#Dreams_Soil_Samrat हि ICAR प्रमाणित सेंद्रिय उत्पादने मोफत मिळतील.मासिक सुविधा सुरु करण्यासाठी संपर्क +९१ ७३७८७६९०९९ .

Comments